जागृती यात्रा भाग ७ : खेडयाकडे चला...?

         मदुराईपासून खरं तर चेन्नई अवघ्या काही तासांच्या अंतरावर. पण ट्रेनचा वेग कमी असल्याने दुपारी बारानंतर आम्ही चेन्नईत पोहोचलो. चेन्नईमध्ये परतीच्या मान्सूनची भीती होतीच. ती खरी ठरली. ऐन हिवाळ्यातसुद्धा तिथं हलकासा पाऊस पडत होता. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही चेन्नईतील 'कांचीपूरम' स्टेशनवर उतरलो. स्टेशनबाहेर कुठेही 'जागृती'च्या बसेस नव्हत्या. त्याचं कारण आजची भेट मुळी धावतीच नव्हती. सर्व यात्रींना स्टेशनपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी जायच्या सूचना दिल्या गेल्या. स्वयंसेवकांच्या दिशादर्शनानुसार आम्ही सर्व यात्री सुमारे एक किलोमीटरभर चालत एका जुन्या इमारतीत गेलो. ही इमारत म्हणजे कोणतेही कार्यालय नव्हते की कोणतीही कंपनी. आज ज्या संस्थेला-'ट्रॅव्हल अनादर इंडिया' (TAI) ला आम्ही भेट देणार होतो त्यांचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. हॉल साधाच होता. बसण्यासाठी फक्त कार्पेटची सोय केली होती, ज्यावर फक्त अर्धेच यात्री मावू शकले. राहिलेल्यांच्या कार्पेट नाहीय, आवाज नीट ऐकू येत नाही इत्यादी कुरबुरी सुरु झाल्यात. मात्र, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली.
  
     औपचारिकता पार पडल्यावर TAI च्या संस्थापिका गौतमी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांच्या संपूर्ण भाषणात TAI बद्दल भरपूर माहिती मिळाली. 'ट्रॅव्हल अनादर इंडिया' हा भारतातील ग्रामीण पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारा चेन्नईस्थित एक मोठा सामाजिक उद्योग (Social enterprise) आहे. तसे ग्रामीण पर्यटनाचा व्यवसाय करणारे अनेक उद्योजक आहेत. पण गौतमीचं वेगळेपण हे की ती ज्या पर्यटनस्थळांना भेट देते तिथंल्या ग्रामीण समुदायाला बरोबर घेवून हे सर्व काम करत आहे. सामाजिक उद्योग असल्याने त्याचं व त्यातील पर्यटन उपक्रमांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण त्या पर्यटनस्थळीच्या ग्रामीण समुदायाकडूनच केले जाते. पर्यटनासाठी भारत म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? संस्कृती व परंपरा यांचा सुंदर मिलाफ असलेला देश. पण भारत बघायचा म्हटल्यावर खरंच हा भारत बघायला मिळतो का? नाहीतर भारतात फिरताना आजसुद्धा काय बघितलं जातं? भारत फिरताना, भारतीय अथवा परदेशी पर्यटक बघतात तो एक टिपीकल भारत असतो- ठराविक शहरांतील प्राचीन वास्तू, गर्दीने भरलेले बाजार, मेट्रो, आणि बीचेस. पण यापलीकडेदेखील एक वेगळा भारत या ’इंडिया’त नांदतोय. खरंतर तिथेच तो मिळतो, पर्यटकाला हवा असलेला 'खरा भारत'. हो. तो भारत म्हणजे भारतातील लोकं, त्यांचं जगणं, त्यांच्या परंपरा, त्यांची संस्कृती. अजूनही ६९% भारत गावांतून राहतो. पण गावांकडं फिरतं कोण? पहिल्या पोस्टमध्ये मी म्हटल्याप्रमाणे भारतात नांदणाऱ्या या विविधतेतील एकतेचा अनुभव इथेच येऊ शकतो. उदाहरणार्थ,TAI ने तयार केलेल्या निसर्गाशी समतोल राखणाऱ्या झोपड्यांमध्ये राहत असतानाच गावरान रानातला उस, राजस्थानमधील ऊंटावरील सफर, कर्नाटकातल्या खेड्यांतून बैलगाडीतून मनमुराद फिरणे, त्याच वेळी बैलांच्या गळ्यात वाजत असलेल्या घुंगरांच्या पार्श्वसंगीतात म्हटलेली अंताक्षरी या साऱ्याची व इतर अनेक गोष्टींची मजा शहरी-परदेशी पर्यटकांना घेता यावी, शहरांतील आणि परदेशी पर्यटकांना खेडयातील हे जगणं जगता यावं, निराळा आनंद लुटता यावा आणि त्याच बरोबर खेडुतांना अर्थार्जनाची एक संधी मिळावी हा गौतमीचा या उद्योगामागील प्रमुख उद्देश आहे.                             

        इरमा (IRMA)- इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट,
आणंदमधून पदवी घेतल्यानंतर गौतमीने ग्रामीण विकासाशी संबंधित कार्य करणाऱ्या अनेक बहुराष्टीय कंपन्यांमध्ये जवळपास १८ वर्षे काम केले. अठरा वर्षांच्या या अनुभवानंतर मग गौतमीने TAI ची स्थापना दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये केली. सध्या TAI ची पर्यटनवारी देशातील फक्त ८ ठिकाणांवरच चालू आहे. यामध्ये सहा गावं व दोन निमशहरं आहेत. त्यात मग हिमालयातील लदाखसारखं निमशहरी सोयी असलेलं तर अजूनही आपला खेडवळ स्पर्श जपलेलं स्पिती हे गाव आहे. मध्य भारतातील होडका व प्राणपूर ही छोटीशी गावं तर दक्षिणेतील कुर्तोरीम, खानापूर, कुंदापूर आणि म्हैसूर अशा आठ ठिकाणांचा या सहलीत समावेश आहे. गावांची ही संख्या २०१३ पर्यंत गौतमीला ३५ पर्यंत न्यायची आहे. भाषणात गौतमी आमच्याबरोबर खूप मोकळेपणाने बोलली. यात्रींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने अगदी हसतखेळत दिली. एका प्रश्नाचं उत्तर देताना तर तिने आपला पहिल्या वर्षाचं नेट प्रॉफिट २३ लाख आहे असं सहजरित्या सांगितलं. हे सगळं करणाऱ्या खेडुतांना योग्य आर्थिक मोबदला मिळतो हे सांगतानाच गौतमी म्हणाली की TAI ने आर्थिक बदलांबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदलही घडवून आणले. उदा. अनेक स्त्रियांना रोजगार मिळाले. खेड्यांत राहणाऱ्या सुशिक्षित स्त्रिया यांमुळे घराबाहेर पडू लागल्या. जुन्या हस्तकलांना परत वाव मिळाला. ग्रामपंचायतीला दर वर्षी एक नवं कर उत्पन्नाचं साधन मिळालं. शहरांतील लोकही आता ग्रामीण संस्कृतीशी जवळून परिचित होताहेत. असे अनेक बदल गावात आता हळूहळू होवू लागले आहेत.
 

     गौतमीच्या भाषणानंतर दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला. ब्रेकनंतर पुन्हा त्याच ठिकाणी सारेजण जमले. आज दुपारच्या सत्रात, यात्रेतील दुसरं पॅनेल डिस्कशन कृषीशी संलग्न विषयावर होणार होतं. पॅनेल डिस्कशनचा विषय होता -Enabling Rural and Agri Enterprises. कृषीतील तीन अनुभवी तज्ञ यात सहभागी झाले होते. पॉल बॅसिल, गाइज्स् स्पूर व वेंकट सुब्रमनियन ही त्या तिघांची नावं. हे सर्व कृषी आंत्रप्रीनर्स आहेत. व्यापकपणे कृषी व विशेषतः भारतीय कृषीवर तिघेही चांगले बोलले. गाइज्स् स्पूर हा मूळचा इंग्लंडचा. २००९ मध्ये त्याला कृषीवर काम करण्यासाठी अशोका फेलोशिप मिळाली आणि तो भारतात आला. सध्या आपल्या 'कॉटन कॉनवर्सेशन्स' या कंपनीच्या माध्यमातून तो राजस्थान,आंध्रप्रदेश,विदर्भात शेतकऱ्यांसाठी काम करतोय. भारतात वस्त्रोद्योग मोठया प्रमाणावर चालतो. पण गाइज्स् म्हणतो तसा तो विखुरलेला आहे. म्हणजे आपल्याकडे कापसाचा उत्पादक-शेतकरी, त्यानंतर कापूस खरेदीदार, विणकर, नंतर हातमाग-यंत्रमागवाले लघु उद्योजक मग मोठे उद्योजक व सर्वात शेवटी ग्राहक अशी साखळी तयार झाली आहे. उत्पादक ते उपभोक्ता अशी थेट साखळी निर्माण झालेली नाही. गाइज्स् म्हणतो त्यामुळे दलालांचं फावतं. ही साखळी तुटली पाहिजे. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेत एक स्थिरता यावी, प्रत्येक घटकाला योग्य नफा मिळावा व पूर्ण व्यवस्थेमध्ये एक प्रकारची व्यावसायिक दक्षता निर्माण व्हावी यासाठी 'कॉटन कॉनवर्सेशन्स' काम करतंय. शिक्षणाने अभियंता पण कृषिला वाहून घेतलेला पॉल हा 'व्हिलग्रो' ह्या कंपनीचा संस्थापक. 'व्हिलग्रो'चं ध्येय आहे शेतीतील सृजनशीलता व व्यावसायिकता या माध्यमातून ग्रामीण भारत सुपीक व संपन्न बनवणे व खेडयांचा विकास करणे. पॉलने Villgro चा अर्थ Village + grow असाही सांगितला. व्हिलग्रोचं कार्यक्षेत्र फक्त आंध्रप्रदेश आहे. वेंकट सुब्रमनियन हा शेतकरी असून 'ई-फार्म' या चेन्नईस्थित उद्योगाचा संस्थापकसुद्धा आहे. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी झाल्यावर घरच्या सदस्यांचा विरोध स्वीकारून वेंकटने थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मार्केटमधल्या दलाली पद्धतीला वेंकटचा पाठींबा आहे. त्याचं म्हणणं हे की दलाल पाहिजेच नाहीतर शेतकऱ्याला शेतीतील कामं सोडून दररोज बाजारात जाऊन बसावं लागेल. वेंकटचं काम गाइज्सच्या बरोबर उलटं. म्हणजे उत्पादक व उपभोक्ता यांच्यात थेट संबंध निर्माण करणे. असंघटीत दलालीमुळे शेतमालाचं जवळपास ४०% नुकसान होतं व बरेचसे शेतकरी अल्प अथवा अशिक्षित असल्याने त्यांना या असंघटीत दलालीमध्ये फसवलं जातं. मग हे टाळण्यासाठी शेतकरी, दलाल यांच्यापासून ते मॉल व रस्त्यांवरील भाजीपाला विक्रेते यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे. 'ई-फार्म' समूह तंत्रज्ञानाच्या मदतीने या सगळ्या गोष्टींवर मात करत आहे. 


ट्रॅव्हल अनादर इंडियाच्या पर्यटन सहलीतील काही क्षणचित्रे   
सौजन्य:  ट्रॅव्हल अनादर इंडिया वेब साईट व ब्लॉग






 

Comments

  1. Changle Anubhav milala tula..Good

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

यशवंतराव.. (भाग १)

मिसकॉल..