जागृती यात्रा भाग ८: 'नांदी' नव्या युगाची..

        ट्रेनमधील आजचा पाचवा दिवस. ट्रेनमधील एकूण वातावरणाला आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. प्रेझेंटेशन, सेमिनार्स, ग्रुप अ‍ॅक्टीव्हीटिज, ट्रेनमधल्याच एका डब्यात जागृती स्टाफच्या अभिनव कल्पनेतून तयार झालेल्या कापडी बाथरूम्समध्ये होणारी आमची हलती अंघोळ इ.सगळ्या गोष्टींत जाम मजा यायची. सहकारी यात्रींबरोबर चांगली ओळख होऊ लागली होती. त्यांच्याकडूनसुद्धा बरंच काही शिकण्यासारखं होतं.संपूर्ण यात्रेत जेवढयाजणांना भेटता येईल तेवढ्यांना भेटत होतो, जे काही घेता येईल ते ते वेचत चाललो होतो. काही यात्री स्वत:च रोल मॉडेल्स असल्यासारखे होते. त्यांची माहिती समारोपाच्या ब्लॉगमध्ये देईनच. 

     तमिळनाडूतला प्रवास संपल्यानंतर आमची ट्रेन आंध्राकडे निघाली. आंध्रपदेशसुद्धा तमिळनाडूसारखंच. तशीच वनराई, मोकळं रान व चरणारी गुरे. तुलनेतला वेगळेपणा म्हटलं तर इथे असलेल्या शंकूच्या आकाराच्या राहुट्या. खिडकीतून दुरून साजरे दिसणारे अचल डोंगर एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे दिसत होते. इथंली सुंदर वृक्षराजी मनात व्यापून जाते व नकळत हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून जाते. भव्य गोदावरी नदी पाहिल्यावर 'ना. धों.'ची  "विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट फुलांची नक्षी; गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी" ही कवितेची ओळ आठवल्याशिवाय राहत नाही. आज ट्रेनने चांगलाच वेग पकडला होता. वाटेतली तुनी, गुल्लीपाडू, एलमांचील्ली, अनकापल्ली ही स्टेशनं पटापट मागे टाकत ट्रेन एकदाची विशाखापट्टणममध्ये पोचली.

     विशाखापट्टणममध्ये आम्ही 'नांदी' या एनजीओला भेट देण्यास गेलो. नांदी फाउंडेशन हे गैरलाभाचे (Non-Profit) मॉडेल आहे. नांदी हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं (PPP) देशातलं एक उत्तम उदाहरण आहे. नांदीची स्थापना १९९८ मध्ये श्री.मनोजकुमार यांनी केली. भारतातील गरिबीचं समूळ उच्चाटन हे नांदीचं मिशन आहे. सध्या नांदी बालहक्क, शिक्षण, माध्यान्ह आहार व  स्वच्छ पेयजल या विषयांवर मोठया पातळीवर काम करत आहे. विशाखापट्टणममध्ये नांदी'त पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिथंल्या  माध्यान्ह आहाराचा प्रकल्प बघितला. संपूर्ण परिसर, तिथलं एकूण काम, अन्नदानाच्या अशा या चांगल्या कार्यात आपला हातभार लागतोय म्हणून झपाटून काम करणारे कर्मचारी व प्रकल्पासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा  जसे की तांदूळ स्वच्छ करण्याचे मशीन, मोठया प्रमाणात भात बनवणारी यांत्रिक सुविधा आदी बघितल्यावर आम्हाला माध्यान्ह आहार प्रकल्पाच्या संचालिका लीना जोसेफ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. लीना जोसेफ यांच्याबरोबरच्या या लघुसंवादानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात मग पहिल्यांदा लीना जोसेफ यांनी प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेतला. त्यात मग त्यांनी विशाखापट्टणम, हैदराबाद यांसारख्या मोठया शहरांपासून ते अगदी आरकूसारख्या आदिवासी क्षेत्रापर्यंत संपूर्ण राज्यात हे अन्न परिवहन कसे केले जाते हे सांगितले. नांदीसमोर सध्या असलेल्या निधी कमी पडणे, अन्नाचा दर्जा कायम ठेवणे, तसेच मदत म्हणून मिळणा
ऱ्या सरकारी व वैयक्तिक तांदळाचा दर्जा अतिशय खराब असणे इत्यादी अडचणी त्यांनी विस्तृतपणे आमच्यासमोर मांडल्या. तसेच अन्न थंड व्हायच्या अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवे म्हणून केल्या जाणाऱ्या उपायांची चर्चा केली. लीना जोसेफ यांनी त्यांच्या छोटयाशा भाषणात भूकेचं एक वेगळं चित्र आमच्यासमोर उभं केलं. शिकण्यासाठी नाही तर पोटाची भूक भागवण्यासाठीच आजसुद्धा अनेक पोरं शाळेत येतात हे वास्तव त्यांनी परखडपणे मांडलं. श्रीमती जोसेफ यांचं भाषण सुरू असतानाच नांदीचे प्रमुख श्री. मनोजकुमार यांचं आगमन झालं. उंच, सडपातळ, डोळ्यांवर असलेला नवीन स्टाईलचा चष्मा आणि गव्हाळ रंगाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असलेला आत्मविश्वास.

      मनोजकुमारांचं भाषण अप्रतिम झालं. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी नांदीबद्दल एक शब्दही काढला नाही. देशप्रेमाने  भारलेल्या या तरुणाचा प्रत्येक शब्द न शब्द कानात साठवून ठेवावासा वाटणारा होता. भाषणाची सुरुवातच मनोजने काश्मीरमधील व्यवस्थेचे वाभाडे काढत केली. काश्मीरमध्ये नव्यानेच सुरु झालेला 'अर्ध
-विधवा' (Half-widows)  ह्या अतिशय विचित्र समस्येबद्दल आम्हाला  त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये अनेक तरुण स्त्रियांचे नवरे काही वर्षांपासून गायब झालेले आहेत. सरकारकडून त्यांना अजूनपर्यंत मृत घोषित केले गेलेले नाही. त्यामुळे या अर्ध-विधवांना कोणत्याही प्रकारची मदत सरकाकडून केली जात नाही. तसेच प्रश्न नवऱ्याच्या अस्तित्वाचा असल्याने त्यांना स्वत:च्या कौटुंबिक संपत्तीवर हक्क सांगता येत नाही. या जटील समस्येने हजारो स्त्रियांना हताश, बेघर व असहाय्य बनवलेले असून, त्यांच्या मुलांना निराधार अवस्थेत लोटून दिले आहे. तिथंल्या तरुणांची अवस्था काही याहून वेगळी नाही. सध्या असलेली मोठया प्रमाणातील बेरोजगारी, समोरच दहशतवादाने घातलेले थैमान, सीमेपलीकडून येणारी जिहादची 'अर्थ'पूर्ण हाक व जगभरातल्या तरुणांसारखे माहिती-तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होवून बदल करावेत असं वाटणारी क्रांतिकारी मानसिकता अशा या विचित्र "आयडेंटिटी क्रायसिस"मध्ये काश्मीरमधलं तरुण मन हेलकावे खात आहे. काश्मीरमधील अर्धविधवा व तरुणांची ही दुख:द समस्यांची कहाणी ऐकल्यानंतर तिथंल्या अदृश्य असुरक्षिततेचा भयंकर चेहरा समोर आला अन क्षणभरासाठी सर्वांचे डोळे पाणावले. 

   नांदी त्यांच्या इतर प्रकल्पांबरोबरच काश्मीरमधल्या या समस्यांवरसुद्धा सध्या काम करत आहे. महिंद्रा उद्योग समूहाच्या मदतीने त्यांनी उभारलेल्या "महिंद्रा प्राईड स्कूल"च्या अनेक शाखा या काश्मिरी युवकांच्या कौशल्यबांधणीचं कार्य भारतातल्या विविध महानगरांतून करत आहेत. तिथे काश्मिरमधल्या या अल्पशिक्षित युवकांना इंग्रजी शिकवण्यापासून ते व्यक्तिमत्व विकासासाठी गरज असलेल्या इतर  अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जातोय. फक्त काश्मिरच नव्हे, तर देशातल्या इतरही अडचणींचा एक लेखाजोखा या निमित्ताने मनोजकुमारांनी आमच्यासमोर मांडला. आंध्रप्रदेशमधल्या आरकू या आदिवासीबहुल भागात नांदीने घडवलेली क्रांती त्यांनी सर्व यात्रींसमोर विषद केली. आज तिथले अनेक आदिवासी नक्षलवाद नाकारत आहेत. एवढंच नाही तर तिथलं उत्पादन असणाऱ्या कॉफीची निर्यात युरोपमध्ये व्हावी यासाठी पुढे येत आहेत. पुढच्या काही मुद्द्यांत तर त्यांनी ओरिसामधल्या कुपोषणाचे  अविश्वसनीय वास्तव उलगडवले. सरकार दरबारी असलेला लालफितीचा कारभार व स्थानिक व्यवस्थेची अकार्यक्षमता यांमुळे होणाऱ्या दिरंगाईने तिथंल्या कुपोषणात अजून कशी भर पडतेय हे ऐकताना अक्षरश: चीड आली. चटकन ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्या मध्यंतरीच्या कुपोषणावरील अहवालाची आठवण झाली. त्यातलं एक वाक्य काळजाला स्पर्शून गेलं होतं. आजही त्याची आठवण झाली तरी तो चटका जाणवतो. साईनाथांनी लिहिलं होतं " लालफितीच्या या कारभारामुळे ओरिसातील कोठारात धान्य तसंच पडलंय. कुपोषितापर्यंत पोचायच्या अगोदर ते तिथंल्या उंदरांच्या घशात जातंय. कलहंडीत (ओरिसातील एक जिल्हा, जो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जास्त कुपोषित जिल्हा मानला जातो) तर कुपोषित अर्भकांपेक्षा तिथले उंदीर जास्त स्थूल आहेत, कारण कोठारातलं धान्य खाऊन ते उंदीर फुगत चाललेत व पोरं मरायला लागलेत.  

     भारत, भारत, भारत! थोडथोडक्या नव्हे तर ढिगाऱ्याने असल्या अनेक समस्या पुढे असलेला भारत कसा आणि कधी महासत्ता बनेल? मनोजच्याच वाक्यांत सांगायचंच तर " भारतातले सर्वात श्रेष्ठ मेंदू (आयआयटीयन्स, कारण आमच्या यात्रेत आयआयटीयन्सचा भरणा खूप होता)  हे सॉफ्टवेअर,शाम्पू व कोकाकोला विकत असतात (कॉलेजमधून चांगल्या कंपनीत प्लेस होतात), त्या 'गरीब' कंपन्यांचा फायदा करण्यासाठी. कुपोषण व त्यासारख्या इतर समस्यांवर मात करण्यासाठी जेव्हा देशातील हे सर्वोत्तम मेंदू पुढे येतील तेव्हा भारताची खऱ्या अर्थाने महासत्तेकडे वाटचाल सुरु झालेली असेल. नव्या युगाची ती खरी 'नांदी' असेल "
 

       नांदीचा कार्यक्रम संपल्यानंतर विशाखापट्टणममध्ये आम्ही नौदलाच्या तळाला भेट दिली. नेव्हीनेसुद्धा आमच्यासाठी त्यांच्या "समुद्रिका" या भव्य सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे आम्हाला युद्धनौका व पाणबुड्यांची बांधणी बघता आली. संध्याकाळच्या चहापानाने तिथंल्या सेशनचा समारोप झाला. पण तिथून पाय निघाल्यापासून मनावर रेंगाळत राहिला तो मनोजकुमार.


Comments

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

यशवंतराव.. (भाग १)

मिसकॉल..