उद्योगविश्वातला तारा..

              कुठेतरी वाचनात उपनिषदांचा संदर्भ आला होता. उपनिषदांमधलं एक संस्कृत वचन तिथे दिलं होतं. ते वचन नेमकं आता आठवत नाही. मात्र अर्थ लक्षात आहे. अर्थ असा होता "सज्जनाला नेहमी दुर्बलतेचा शाप असतो व समर्थला दुर्जनेतच वरदान असतं." मग पुढे लेखकाने सज्जन हे चारित्र्यवान असतात पण समाजात घडण्याऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी कमी पडतात किंवा अनेकदा दुर्बल ठरतात. तर जो हे सगळं करू शकेल तो 'समर्थ', दुर्दैवाने बऱ्याचदा दुर्जन कसा असतो हे मार्मिकपणे पटवून दिले होते. तसेच, शेवटी तुम्ही 'समर्थ सज्जन' बना असा गोड संदेशही दिला होता आणि मूल्यांचं   महत्व  अधोरेखित केलं होतं. हे आठवण्याचं कारण एवढंच, की मानवी मुल्ये व नैतिकतेचा हळूहळू ऱ्हास होत असलेल्या या ढासळत्या युगातही या मूल्यांना केंद्रबिंदू मानून जगणारी काही माणसं अथवा संस्था अजून आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना "समर्थ सज्जन" म्हणावं अशी चारित्र्यवान व कार्यक्षम माणसं, अशा संस्था. टाटा उद्योगसमूह हा त्यापैकीच एक. टाटा उद्योगसमूह हा फक्त उद्योगसमूह कधीच नव्हता तर स्वच्छ  कारभार, सामाजिक बांधिलकी व मानवी मूल्यांची जपणूक यामुळे तो एक ब्रँड बनला होता. अजूनही आहे. १९९० साली जेव्हा रतन टाटांकडे या उद्योगसमूहाची सूत्रे आलीत तेव्हा समूहात एकूण १४  कंपन्या होत्या. आज त्यांची संख्या शंभरावर असून ८० देशांमध्ये त्यांचा पसारा पसरलाय. एवढा पसारा म्हणजे हे फक्त जाळं नाही तर टाटा म्हणजे एक क्लास आहे, एक ब्रँड आहे, एक standard आहे. आज युरोपातील टेटली चहा, अमेरिकेतील रिट्झ कार्लटन हॉटेल, जग्वार व लॅण्ड रोव्हर सारख्या गाड्या हा सारा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा श्रीमंती थाट ही आजच्या या 'क्लास'ची ओळख आहे.

 
          टाटा उद्योगसमुहाची सर्वाधिक सुत्रे राहिलीत ती जेआरडी टाटांकडे. ती पण तब्बल पन्नास वर्षांसाठी. त्यांच्या कालावधीत या समुहाने खऱ्या अर्थाने कात टाकली. जेआरडी द्रष्टे होते. काळाच्या पुढे चार पावलं पाहायचा त्यांचा गुण केवळ टाटा उद्योगसमुहालाच नव्हे तर भारतालाही बदलवणारा होता. आणि म्हणुनच ज्यावेळी नुकताच देश स्वतंत्र झाला होता तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना देशात उत्तम अभियंते तयार व्हावेत यासाठी तुझ्याकडे काय योजना आहेत, असे विचारण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता आणि तशी काही योजना नाही, हे सांगण्याचा प्रामाणिकपणा पं. नेहरू यांच्याकडे होता. तेव्हा द्रष्टय़ा जेआरडींनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (TIFR) पाया घातला आणि त्यातून आज देशाला अणुतंत्रज्ञानात स्वावलंबत्व देणारी यंत्रणा आणि अभियंते उभे राहिले. तीच बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, बेंगलोरमधील इंडिय़न इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील नॅशनल सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अथवा पुर्वीचं एअर इंडिया यांसारख्या देशाच्या प्रगतीत भर टाकणार्या अनेक संस्था वा यंत्रणा ही टाटांची देशाला मिळालेली अनमोल देणगी आहे. 

          क्रिएटिव्ह काहीही करायचं असलं तर त्यासाठी संवेदनशीलता गरजेची असते. संवेदनशील असल्याशिवाय माणसाला नविन काही घडवता येत नाही. ही संवेदनशीलता हर क्षणी जागृत असावी लागते. मग क्षेत्र कोणतंही असो, साहित्य,कला इथंपासून ते उद्योगापर्यंत; सर्वांना हा नियम लागू. म्हणूनच भारतात कुठेतरी स्कूटरवरून निघालेल्या चारजणांच्या कुटुंबाचा प्रवास बघून मन हेलावणं आणि त्यातून जगातल्या सर्वात स्वस्त अशा नॅ
नो कारचा जन्म होणं हे कारुण्यमयी संवेदनशीलतेचंच उदाहरण आहे. टाटा उद्योगसमुहाची सृजनशीलता ही नेहमी अशीच संवेदनशीलतेतून व हलाखीचं जगणं जगणाऱ्या सामान्यजनांबद्दल असलेल्या करुणेतून प्रसवत राहिली आहे. यामुळेच अगदी सर्वसामांन्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये बनवलेला वॉटर प्युरीफायर असो वा कर्करोगाशी लढण्यासाठी मुलभूत संशोधन करणारे रुग्णालय असो; मिठापासून ते मोटारीपर्यंत भारतीयांच्या जीवनास सर्वांगाने स्पर्श करणाऱ्या या उद्योगसमुहाने अशा अनेक प्रकारे देशाच्या उभारणीसाठी मदत केलेली आहे. टाटांनी त्यांच्या ट्रस्ट्सच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो रुग्ण,विद्यार्थी, आदिवासी,वंचित इ. गरजूंना कोट्यवधींची मदत केलेली आहे. अगदी आपदग्रस्तांसाठी कायमस्वरूपी मदतदेखील या ग्रुपने केलेली आहे. 'ताज' हल्ला हे त्याचं ताजं उदाहरण. या हल्ल्यातील जखमी व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं व रेल्वेनं आर्थिक मदत दिली. मात्र ती तुटपुंजी होती. या पार्श्वभूमीवर टाटांनी त्यांच्या वेल्फेअर ट्रस्टकडून गेली तीन वर्षे १३८ कुटुंबांना कोट्यवधींची मदत केली आहे. यांतील अनेक कुटुंबे टाटा समूहाशी काडीमात्रही संबंध नसलेली होती, हे विशेष.

           समाजाच्या व देशाच्या प्रती असलेलं हे उत्तरदायित्व हे केवळ 'ताज'सारख्या एखाद्या घटनेनं येत नसतं तर ते मुळातंच असावं लागतं. ते असणं हीच संवेदनशीलता. हे असं उत्तरदायित्व मनात येण्याची वा सहकाऱ्यांच्याही मनात रुजवलं जाण्याची प्रक्रिया टाटा उद्योगसमुहात गेल्या शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळाहून अबोलपणे घडत आहे. अलीकडच्या 'वर्क-कल्चर'ने त्याला "कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" हे नाव दिलं. पण ते कुणाच्याही स्वप्नातदेखील नव्हतं तेव्हापासून टाटा उद्योगघराण्यात ते जपलं जात आहे. अशा गोष्टी नुसत्या ट्रस्ट स्थापन करून आणि कर लो दुनिया मुठ्ठी में अशी साद घालून होत नाहीत तर कर्तृत्वाबरोबरच तिथे हवा असतो तो ओलावा, सहानुभूती व संवेदनशीलता. म्हणूनच या कर्तृत्ववान समूहाने नेहमीच संवेदनशीलता व मुल्ये यांची कावड खांद्यावरून कधीच उतरून दिली नाही. जेआरडींच्या शेवटच्या दिवसात गल्लाभरू व नफेखोर कंपन्यांची व्यवस्था जन्माला येत होती. यावर एका पत्रकाराने त्यांना प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळी जेआरडींनी म्हटले होते "Class is permanent,Form is temporary." या अशा 'क्लास'ची,एका standardची, एका संस्कृतीची धुरा आता विनम्र अशा सायरस मिस्त्रींकडे जात आहे. टाटा उद्योगसमूहाला साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे.मितभाषी,प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या सायरसना सभा, भाषणे व पेज थ्री कल्चरचे वावडे आहे. वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे. सायरस हे सूर्यमंडळातल्या एका ताऱ्याचे नाव आहे. 'टाटा उद्योगसमूह'  हादेखील भारतातील उद्योगविश्वात तारा म्हणून चमकलेला आहे. आता सायरस यांना स्वत:च्या नावाप्रमाणे या उद्योगसमूहाला जगभरातील उद्योगविश्वात चमकावयाचे आहे आणि सायरस ते करतीलच. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशवंतराव.. (भाग १)

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

मिसकॉल..